जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आता दोन गटांमध्ये उघडपणे विभागला गेला असल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवार 23 ऑगस्ट रोजी शहरातील तान्हा पोळा उत्सवासाठी भाजपच्या बॅनरखाली दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या आयोजनामुळे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट तर दुसरीकडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांचा गट अशा दोन गटांची फूट उघड झाली.
विशेष म्हणजे, दोन्ही गटाने मोठ्या मोठ्या बॅनरवर “भारतीय जनता पार्टी” असे पक्षाचे नाव ठळक अक्षराने छापले होते. मात्र भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांच्या गटाने शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या बॅनरवर इतर नेत्यांसोबत संजीवरेड्डी बोदकुरवार व भाजप शहर अध्यक्ष नीलेश चौधरी यांचे फोटो छापणे टाळले. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलूरकर तर्फे कल्याण मंडपम येथे आयोजित तान्हा पोळा उत्सवाच्या बॅनरवर विजय चोरडिया व कुणाल चोरडिया यांचे फोटो वगळण्यात आले.
हंसराज अहिरने येणे टाळले!
तान्हा पोळा उत्सवासाठी दोन्ही गटाकडून माजी केंद्रीय मंत्री व केंद्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र कुणाल चोरडिया आयोजित तान्हा पोळा उत्सव हा भारतीय जनता पार्टी अधिकृत नसल्याचा आक्षेप बोदकुरवार गटाने नोंदविला. त्यामुळे हंसराज अहिर यांनी वेळेवर दोन्ही कार्यक्रमात येणे टाळल्याचे बोलले जाते. तर माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे व्यक्तीक कारणामुळे दोन्ही कार्यक्रमात हजर राहिले नाही.
जिल्हाध्यक्षांची “चलता है” ची भूमिका
वणी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे तान्हा पोळा उत्सवाचे दोन कार्यक्रम तसेच बॅनरवर फोटोबाबत भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ‘अनेक ठिकाणी असे होत असते’ असे सांगून यवतमाळ व नागपूर येथेही पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम झाल्याचे सांगितले.
आगामी निवडणुकीवर परिणाम ?
या गटबाजीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता असून, “कोणाच्या मागे उभे राहायचे?” या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडत नाही. स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या या विभागणीचा थेट परिणाम आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या मतपेटीवर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
निष्कर्ष
वणीतील भाजपमधील गटबाजी आता उघड युद्धाच्या स्वरूपात पुढे आली आहे. नेतृत्वातील मतभेद, बॅनरवरील फोटो-पॉलिटिक्स आणि नेत्यांतील परस्पर नाराजी यामुळे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. या गोंधळाचा फायदा विरोधक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकीत ही गटबाजी भाजपसाठी स्वत:च्या पायावर कुर्हाड मारण्यासारखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.










