वणी टाईम्स न्युज : आजच्या युगात एकदा हरवलेली वस्तू परत मिळणे दुरापास्त आहे. मात्र एका महिलेच्या प्रामाणिकपणाने हरवलेला मोबाईल (Smart Phone) मूळ मालकाला परत मिळाला. दिनांक 23 ऑगस्ट रोजी समोर आलेल्या या प्रकरणातून समाजात काही लोकांमध्ये आजही ईमानदारी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पंचशील नगर येथील राखी रामेश्वर कांबळे नामक महिला आपल्या कुटुंबासह शनिवारी सायंकाळी शासकीय मैदान येथे तान्हा पोळा बघायला गेली होती. नंदी बैलाची सजावट पाहण्याच्या दरम्यान तिची नजर खाली पडलेल्या एका मोबाईलवर गेली. तिनं तो मोबाईल उचलून आपल्या जवळ ठेवला. मोबाईल मालक शोधात येईल या उद्देशाने ती तिथं उभी राहिली. मात्र बरीचवेळ होऊन ही कोणी आले नाही. त्यामुळे राखी कांबळे हिने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठून सापडलेलं मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.
बेवारस आढळलेल्या मोबाईला पॅटर्न लॉक असल्याने उघडणे शक्य झाले नाही. तसेच मोबाइलवर कोणाचा कॉलसुद्धा आला नाही. त्यामुळे हरवलेला मोबाईल नेमका कुणाचा याचा शोध लागत नव्हता. दरम्यान रात्री 9 वाजता सुमारास त्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला व तिनं आपले नाव पूजा संकेत मेश्राम, रा. रंगनाथ नगर सांगून सदर मोबाईल तिचा असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच मोबाईलच्या मालकी हक्काबाबत पुरावे सादर केले.
मोबाईल मालक महिला एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असल्याने मोबाईल परत घेण्यासाठी त्यांनी पती संकेत नामदेव मेश्राम यांना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला पाठवले. पोलिसांनी सर्व शहानिशा करून ज्या महिलेने प्रामाणिकपणाचे परिचय देऊन मोबाईल परत केला, त्या राखी रामेश्वर कांबळेच्या हस्ते फिर्यादी यास हरवलेला मोबाईल परत केला.
मोबाईल परत मिळाल्याने पूजा मेश्राम यांनी आनंद व्यक्त केला. तसेच प्रामाणिकपणाचा परिचय देणाऱ्या राखी कांबळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत प्रामाणिकतेने केलेल्या या कृतीचे वणी परिसरात कौतुक होत आहे.











