वणी टाईम्स न्युज | यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार, शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि विविध अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थ मनोज सुधाकर नवले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने शासकीय नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काही गंभीर मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
• शासनाने जप्त केलेल्या रेतीची बेकायदेशीर विल्हेवाट लावून न्यायालयात खोटी माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप
• प्रत्यक्षात खरेदी न केलेल्या सुमारे ४०० ब्रास रेतीची खोटी नोंद दाखवून लाखो रुपयांचा अपहार
• मनरेगा (MGNREGA) अंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे व निधीचा गैरवापर
• गावातील काँक्रीट रस्त्यांमध्ये दर्जाहीन काम; भेगा बुजवण्यासाठी चुकीच्या तांत्रिक उपायांचा वापर
• शासकीय जागांवर अतिक्रमण व त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तसेच, अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले असून २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता. मात्र, त्या ठरावावर सरपंचांनी सही करण्यास नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासनात बिघाड
ग्रामपंचायतीतील मनमानी कारभारामुळे तब्बल आठ सदस्यांनी राजीनामा दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून, यामुळे स्थानिक प्रशासनातील गंभीर बिघाड अधोरेखित झाला आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
तक्रारदाराने या प्रकरणातील सर्व बाबी भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचे सांगत पुढील मागण्या केल्या आहेत:
• संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करणे
• संबंधित सरपंच, उपसरपंच व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे
• अपहार झालेल्या निधीची संबंधित व्यक्तीकडून वसुली
• दोषींना निलंबित किंवा बडतर्फ करणे
ही तक्रार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्रात नोंदविण्यात आली असून, आता राज्य सरकारकडून या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










