वणी टाईम्स न्युज | भालर वसाहतीत एका महिला वकिलावर चाकूने हल्ला व विनयभंग केल्याची तक्रार प्रकरणी वेकोलीच्या अधिनस्त कार्यरत आयटक युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते सुनील भाऊराव मोहितकर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहे. तत्कालीन सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे यांनी सूडभावनेतून महिलांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
मोहितकर यांनी सांगितले की, कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी तत्कालीन सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे यांना जाब विचारला होता. याच कारणामुळे घरडे यांनी मनात राग धरून सूडभावनेतून कपट कारस्थान रचल्याचा आरोप त्यांनी केला. कामगारांना विविध कारणांवरून त्रास दिल्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खोट्या तक्रारीचा आरोप, 18 दिवसांचा कारावास
मोहितकर यांच्या मते, कार्यालयातील एका महिला कर्मचारी हिला हाताशी धरून 15 ऑक्टोबर 2025 रोजी वणी पोलीस ठाण्यात अपहरणाची खोटी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात त्यांना तब्बल 18 दिवस कारागृहात राहावे लागले. या काळात स्वतःसह कुटुंबीयांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील बदनामी ही सर्वात मोठी हानी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
वकील महिलेवर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला ! केस मागे घेण्याची धमकी
दुसऱ्या प्रकरणावरही संशय
17 मार्च 2026 रोजी भालर येथील वास्तव्यास अॅड. सोनिया अमृत गजभिये यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात चाकू हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीतील वेळेत आपण निवली (ता. वणी) येथे घराच्या बांधकामस्थळी उपस्थित असल्याचे पुरावे पोलिसांना सादर केल्याचा दावा मोहितकर यांनी केला. त्यामुळे ही तक्रारही बनावट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
संबंधांवर प्रश्नचिन्ह ?
तक्रारकर्त्या महिला अॅड. गजभिये या भालर येथील डी/१ वसाहतीत राहत असून हे निवासस्थान पूर्वी सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे यांना अलॉट करण्यात आले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर D/1 क्वार्टर मध्ये सदर महिला राहत आहे. त्यामुळे दोघांमधील संभाव्य संबंधांवरही मोहितकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये साम्य असल्याने हे एक नियोजित कारस्थान असू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
अब मेरी बारी है …!
तत्कालीन सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे आणि कामगार नेते सुनील मोहितकर यांच्यात वाद सुरु असताना 3 मार्च होळीच्या दिवशी घरडे यांनी मोहितकर यांच्या व्हॉट्सॲप वर ” अब मेरी बारी बारी है, बुरा न मानो होली है” असा मेसेज पाठवून अप्रत्यक्षरित्या धमकावल्याचा आरोपही सुनील मोहितकर यांनी केला आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचे मोहितकर यांनी सांगितले. तसेच, महिलांना हाताशी धरून कामगार नेत्यांचा छळ करण्याचा प्रकार तर घडत नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
(टीप : संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून, सर्व आरोप हे संबंधित व्यक्तींच्या वक्तव्यांवर आधारित आहेत.)










