जितेंद्र कोठारी, वणी: लोकशाहीची खरी ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा, शाळा या सर्व बाबींचं नियोजन व अंमलबजावणी नगरपरिषदेमार्फतच होत असते. म्हणूनच नगरसेवक हा जनतेचा सर्वात जवळचा प्रतिनिधी मानला जातो. पण प्रत्येक निवडणुकीत एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो — “नगरसेवक निवडताना आपण पक्ष पाहायचा की व्यक्ती?”
🔹 तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून निवडून द्या – हीच मानसिकता घातक!
बहुतांश मतदारांना एखाद्या पक्षाशी असलेली निष्ठा मतदानाच्या वेळी नगरसेवकाच्या गुणवत्तेपेक्षा मोठी वाटते. त्यामुळे जो कोणी त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, त्यालाच आपला माणूस म्हणून मतं दिली जातात. परिणामी, नगरसेवकाची निवड पक्षावर होते, कार्यकौशल्यावर नाही. नगरसेवक हा पक्षाचा कार्यकर्ता असू शकतो, पण तो निवडून आल्यावर संपूर्ण प्रभागाचा प्रतिनिधी बनतो. त्याने मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची सेवा करायची असते, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना.
🔹 तो मागच्या काळात नगरसेवक होता, म्हणून निवडून द्यायचं का ?
एखाद्या व्यक्तीने पूर्वी नगरसेवक म्हणून काम केले, हे चांगले आहे. पण त्या काळात त्याने नेमकं काय केलं? किती कामं प्रत्यक्षात पूर्ण झाली? नागरिकांच्या अडचणींना न्याय दिला का? या गोष्टींचा हिशेब घेणं आवश्यक आहे. फक्त “तो आधी होता” म्हणून पुन्हा निवडून देणं म्हणजे जुन्या सवयींचा पुरस्कार करणे!लोकशाहीत प्रत्येक प्रतिनिधीचा कामगिरी अहवाल जनतेसमोर मांडला गेला पाहिजे. “कार्य अहवाल पाहून मतदान” ही संस्कृती निर्माण होणं अत्यावश्यक आहे.
🔹 मतदान म्हणजे जबाबदारी- जनजागृतीची वेळ आली आहे
आज अनेक प्रभागात मतदान टक्केवारी कमी असते. लोक मतदानच करत नाहीत, आणि नंतर शहरातील सुविधांवर नाराजी व्यक्त करतात. मतदान म्हणजे तक्रार करण्याचं नव्हे, तर बदल घडवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने पक्षाचा झेंडा पाहून नव्हे, तर उमेदवाराचा चारित्र्य, प्रामाणिकपणा, जनसंपर्क, विकासदृष्टी आणि कामगिरी पाहून मतदान करावं.
🔹 जनतेचा नगरसेवक-हाच खरा अर्थ
नगरसेवक हा जनतेचा सेवक असावा, पक्षाचा नाही. त्याच्या मनात “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” अशी भावना असावी. पक्षनिष्ठेपेक्षा जननिष्ठा मोठी असते. नगरसेवक निवडताना आपण “पक्षाचा कार्यकर्ता” नव्हे, तर “प्रामाणिक कार्यकर्ता” निवडत आहोत याची खात्री असली पाहिजे. आपलं शहर कसं असेल, हे आपल्यावरच अवलंबून आहे. मग चला, यंदाच्या निवडणुकीत निर्णय ठाम घ्या “आम्ही पक्षासाठी नव्हे, प्रभागाच्या प्रगतीसाठी मतदान करू.”










