वणी टाईम्स न्युज | मारेगाव तालुक्यातील चोपन शेतशिवारात जुन्या वैमनस्यातून शेतातील कोठ्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 326(f) आणि भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पंकज सुरेश खिरटकर (33) रा. चोपन, ता. मारेगाव यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गावालगत त्यांचा शेत आहे. दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते घराच्या छतावर असताना शेताच्या दिशेने धूर निघताना दिसला. त्यांनी तत्काळ शेताकडे धाव घेतली असता शेतीसाठी लागणारे विविध अवजारे व साहित्य ठेवलेल्या कोठ्याला आग लागलेली दिसली.
फिर्यादी कोठ्याजवळ गेला असता त्यावेळी शेजारील शेतातील उदय भाऊराव खिरटकर (वय 37) व प्रविण भाऊराव खिरटकर (वय 35) हे घटनास्थळावरून पळून जाताना दिसून पडले. यानंतर फिर्यादीने वडील, चुलत काका आणि मित्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत लाकडी अवजारे, स्प्रे पंप, स्प्रिंकलर सेट, खताच्या पिशव्या, ताडपत्री, चाकांची जोडी, वीज तारा, तसेच कोठ्याचे बांधकाम साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.
मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार
या घटनेत सुमारे 1 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादातून शेजारील शेतमालक उदय भाऊराव खिरटकर व प्रविण भाऊराव खिरटकर यांनी जाणूनबुजून आग लावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ASI दिगंबर किनाके करीत आहेत.










