वणी टाईम्स न्युज : शेतात बैल चारत असताना अचानक आभाळ दाटून आलेल्या पावसादरम्यान आस्मानी वीज कोसळून एक तरुण ठार झाला तर 2 तरुण गंभीर जखमी झाले. वणी तालुक्यातील तेजापूर येथे बुधवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता ही दुर्देवी घटना घडली. धम्मरत्न सुधाकर भगत (23) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा नाव आहे. तर गजानन दिवाकर कोंडेकर (24) व पूनम संजय मालेकर (23) हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार तेजापूर येथील तिघ मित्र भगत यांचे शेतात बैल चारायला जाऊन होते. दुपारी 1.30 वाजता दरम्यान अचानक आभाळ दाटून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. पावसातून बचाव करण्यासाठी तिघजणं शेतातील मांडवाखाली जाऊन बसले होते. दरम्यान मांडवावर आस्मानी वीज कोसळली. त्यात धम्मरत्न भगत हा जागीच ठार झाला. तर विजेच्या धक्क्याने गजानन कोंडेकर व पूनम मालेकर हे दोघं जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना वणी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी धम्मरत्न याला मृत घोषित केले.तर जखमी झालेले दोन्ही तरुणांना एका खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मृतक धम्मरत्न हा आई वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील अर्धांगवायू (लकवा) आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या मागे आई वडील व 4 विवाहित बहीणी आहे. कुटुंबातील एकुलता कमावता व्यक्ती गेल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










