
“राजा सुजाण तर प्रजा सुखी” ही म्हण आज वणी शहरात उपहासाचा विषय ठरत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या वणी शहरात सध्या कायदा अस्तित्वात आहे की नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण येथे जे घडते आहे, ते पाहता “अंधेर नगरी, चौपट राजा” हीच म्हण वास्तव दर्शवते.
शहरातील जवळपास सर्वच शासकीय विभागांत अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली, नियम-कायद्यांची पायमल्ली आणि “तुमचं जे करायचं ते करा” असा मग्रूर आविर्भाव—हेच आजचे प्रशासनाचे खरे स्वरूप बनले आहे.
शहरातील शासकीय विभागांची पोलखोल करणाऱ्या मालिकेचा पहिला भाग : नगर परिषद प्रशासनाचे कारनामे
अवैध बांधकामांचा सुकाळ — नगर परिषद मुकदर्शक का?
नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू आहेत. प्रशासक राजवटीच्या काळात बांधकाम नियम धाब्यावर बसवून परवानग्या दिल्या गेल्या. इतकेच नव्हे तर अनेक इमारती व ले-आऊटमध्ये मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम सर्रास झाले.
ले-आऊटमधील सर्व्हिस रोड व ओपन स्पेस भूखंडधारकांनी विकून खाल्ल्या, मात्र त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई झाल्याचे दिसत नाही. नियम फक्त कागदावरच आहेत का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
अतिक्रमणांचा विळखा — शहर श्वास कोंडतोय
वणी शहरातील रस्ते व फूटपाथ आज अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केले आहेत. नांदेपेरा मार्ग हा राज्यमार्ग असतानाही त्यालगतच्या सर्व्हिस रोडवर पक्क्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.
• जत्रा मैदान पूर्णतः अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
• साई मंदिर ते टागोर चौकपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फळ-भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटलेली आहेत.
• शहराचे हृदयस्थळ असलेले टिळक चौक व गांधी चौक अतिक्रमणधारकांच्या ताब्यात गेले आहे.
• मुख्य बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर पक्के ओटे व पायऱ्या बांधून रस्ते अरुंद केले आहेत. परिणामी नागरिकांना पायी चालायलाही जागा उरलेली नाही.
पार्किंग कुठे आहे ? की हा प्रश्नच गैरसोयीचा!
तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने दररोज हजारो नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांनी वणी शहरात येतात. स्थानिक नागरिकही खरेदीसाठी वाहने घेऊन बाहेर पडतात.
• मात्र शहरात एकही अधिकृत सार्वजनिक वाहनतळ नाही.
• मोठे दवाखाने, शोरूम, बँका यांना स्वतःचे पार्किंग नसतानाही बांधकाम परवानग्या कशा दिल्या गेल्या?
• या परवानग्यांची चौकशी नवीन नगराध्यक्ष करणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
संपूर्ण शहरच भाजीमंडी ?
• कोरोना काळात दिलेली तात्पुरती सवलत आज कायमस्वरूपी अराजकतेत बदलली आहे. चौकाचौकात सुरू झालेली भाजी विक्री आता संपूर्ण शहरभर पसरली आहे.
• साई मंदिर ते टागोर चौकदरम्यान रस्त्याच्या कडेला लागलेल्या भाजीमंडीमुळे वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली आहे.
• नगर परिषदेला जर फळ-भाजी विक्रेत्यांसाठी एक ठरावीक, नियोजित जागा उपलब्ध करून देता येत नसेल, तर शहर नियोजनाचा दावा तरी कसा करता येईल?
प्रश्न अनेक… उत्तरं कुठे?
वणी शहर आज नियमशून्यतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रशासनाची जबाबदारी, नागरिकांचे हक्क आणि कायद्याचे अस्तित्व—या सगळ्यांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे.
ही केवळ सुरुवात आहे.










