वणी टाईम्स न्युज : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत निर्मित मुकुटबन ते पिंपरड मार्गावरील रेल्वे बोगद्या लगतचा रस्ता सध्या अपघाताला आमंत्रण देत आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने खड्डे पूर्णपणे अदृश्य झाले असून, त्यामधून लोखंडी सळाख्या उघड्या अवस्थेत बाहेर निघाल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोका अधिकच वाढला आहे.
मुकुटबनच्या दक्षिण दिशेला जाणारा हा रस्ता पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर आणि मांगलीसारख्या गावांशी जोडलेला आहे. याच मार्गावर असलेल्या आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या डोलोमाईट खाणीत कामावर जाणारे कामगार दररोज या रस्त्याने ये-जा करतात. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याखाली मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे या खड्ड्यांमधून धोकादायक सळाख्या उभ्या राहिल्याने त्या वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करत संबंधित बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांची मागणी :
रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत आणि उघड्या सळाख्या काढून टाकाव्यात. अन्यथा संभाव्य अपघातास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
#गावाकडच्या बातम्या
(मुकुटबन येथून मनोज अडपावार यांची रिपोर्ट)










