वणी टाईम्स न्युज : लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा कणा मानला जातो. काळानुरूप निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल झाले असून, त्यात सोशल मिडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पूर्वी प्रचारासाठी सभा, भित्तीपत्रके, वृत्तपत्रे व दूरदर्शन यांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आज फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, युट्यूब व डिजिटल न्यूज पोर्टल यासारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्ममुळे प्रचाराची दिशा आणि दशा दोन्ही बदलल्या आहेत. नुकतेच झालेल्या वणी नगर परिषद निवडणुकात भारतीय जनता पक्षाच्या यशामागे सोशल मिडीयाचा मोठा हातभार आहे, हा वास्तव कोणी नाकारु शकत नाही.
नगर परिषद निवडणुकीत भाजपाने सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर केला. इंस्टाग्राम रिल्स, यूट्यूब लाइव्ह, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सॲप स्टेट्स तसेच स्थानिक न्यूज पोर्टलवर जाहिरात व सकारात्मक बातम्यांमुळे भाजपने सुरुवातीपासून प्रचारात आघाडी मिळवली. कोणत्याही मध्यस्थांशिवाय आपली भूमिका, धोरणे, विकासकामे आणि भविष्यातील योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्यात भाजप यशस्वी ठरली. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे) पक्ष सोशल मिडिया प्रचारात नियोजनशून्य असल्याचे दिसून आले.

सोशल मिडियामुळे उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना थेट मतदारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. यामुळे मतदार अधिक माहितीपूर्ण होतो आणि राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतो. निवडणुकीदरम्यान सोशल मिडिया जनमत घडविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रचार व्हिडिओ, पोस्ट, लाईव्ह चर्चा, प्रश्नोत्तर सत्रांमुळे मतदार उमेदवारांचे विचार, व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्षमता जवळून पाहू शकतात. विशेषतः तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी साधन ठरले आहे.

याशिवाय, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर प्रचार करणे हे सोशल मिडियाचे मोठे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण व शहरी भागात एकाच वेळी संदेश पोहोचवणे शक्य झाले असून, निवडणूक प्रचार अधिक गतिमान झाला आहे. तात्काळ प्रतिक्रिया, समर्थन किंवा विरोध दिसून येत असल्याने उमेदवारांना जनमताचा अंदाजही घेता येतो. एकंदरीत, सोशल मिडियाने निवडणूक प्रक्रियेला नवे आयाम दिले आहेत. योग्य व जबाबदार वापर झाल्यास सोशल मिडिया लोकशाही अधिक बळकट करू शकतो. माहितीपूर्ण, सजग आणि सक्रिय मतदार घडविण्यात सोशल मिडियाचे योगदान भविष्यातही निर्णायक ठरणार आहे.










