जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. राज्यात महायुतीने इतिहास रचून बहुमत मिळविला. भारतीय जनता पक्षाने राज्यात 148 जागा लढवल्या. त्यापैकी 132 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. भाजपची त्सुनामी असताना मात्र वणी विधानसभेची सीट भाजपने गमावली. मतदार संघात कोट्यवधीचे विकास कामे व लोकप्रिय जन प्रतिनिधीची प्रतिमा असताना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा गणित या निवडणुकीत नेमकं कुठं चुकलं ? दोनदा निवडून आलेले व तिसऱ्यांदा निवडून येण्याची शाश्वती असताना संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हॅट्रिकमध्ये नेमकं कोणता फॅक्टर आडवं आला ? याबाबत थोडक्यात आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की….

🔺मागील 2 टर्म पासून आमदार असताना मतदार संघातील ग्राम पंचायती, सोसायट्या, बाजार समिती व इतर संस्थेवर आपली पकड मजबूत करण्यास बोदकुरवार अपयशी ठरले. वणी शहर व तालुका वगळता मारेगाव व झरीजामणी तालुक्यात संघटनामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली नाही. या 10 वर्षाच्या काळात मारेगाव व झरीजामणी तालुक्यात कर्मठ कार्यकर्त्यांची फळी तयार केली नाही. भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी ठेकेदारी व्यवसाय सुरु केले. त्यामुळे काही प्रमाणात लोकांची नाराजी होती.
🔺 आमदारकीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात बोदकुरवार यांनी विकास कामे करताना वणी शहराला जास्त प्राधान्य दिले. परंतु वणी ग्रामीण, मारेगाव व झरीजामणी तालुक्यात परिस्थिती आज ही तशीच आहे. लोक प्रतिनिधींनी मतदार संघातील सर्व नागरिकांना समान वागणूक द्यायला हवी. मात्र ज्या गावातून भाजपला मत मिळत नाही, त्या गावाच्या विकासाकडे बोदकुरवार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांच्यावर होत राहिले आहे.
🔺रस्ते, पूल, नाट्यगृह, पाणी पुरवठा योजना व इतर कामामध्ये कमिशन तसेच कंत्राटदारां सोबत आर्थिक हितसंबंधाचे आरोप मागील काळात आमदार बोदकुरवार यांच्यावर करण्यात आले. मात्र आरोपांचे खंडन, बचाव किंवा खुलासा करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरी फळीचे सक्षम कार्यकर्ता (Defender Team) ची कमतरता भासली.
🔺आमदार बोदकुरवार व भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यामध्ये मागील 2-3 वर्षापासून शीतयुद्ध सुरू होते. याची जाणीव बोदकुरवार यांनाही होती. परंतु निवडणुकीत याचे काय परिणाम होईल याची बोदकुरवार यांनी कधी गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे लक्षात येते. तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया सुद्धा बोदकुरवार यांचे प्रचारापासून अलिप्त राहिले. बोदकुरवार यांच्या पराभवात या दोन्ही नेत्यांची नाराजीचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते.
🔺ऐन निवडणुकीच्या काळात ‘घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे’ प्रमाणे भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी कुणबी समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप बोदकुरवार यांचा पराभवाचा प्रमुख कारण ठरल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे उमेदवार कुणबी समाजाचे संजय देरकर यांना या विषयाला मुख्य मुद्दा बनवून मतदारांसमोर मांडण्यात यश आले. ज्यामुळे कुणबी समाजाचे हजारों मत बोदकुरवारच्या जागी देरकरांच्या मतपेटीत पडले.
🔺राज्यातील इतर उमेदवारांप्रमाणे बोदकुरवार यांनाही मतदार संघातील लाडकी बहिणीने साथ दिली. मात्र कापूस व सोयाबीन या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची नाराजीचा फटका बोदकुरवाराना बसला. निवडणुकीत मनसे उमेदवार राजू उंबरकर व काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना जेवढे जास्त मत मिळेल ते भाजपसाठी फायद्याचे ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही उमेदवाराना अपेक्षित मत न मिळाल्याने शिवसेनेचे संजय देरकर यांचा विजयाचा मार्ग सुकर व संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पराभवाचा मार्ग मोकळा झाला.
टिप: वरील लेख हे संपादकाचे स्वतःचे मत आहे. वाचक किंवा दुसरं कुणी या मतांशी सहमत असेल, हे आवश्यक नाही.










