वणी टाईम्स न्युज : वर्ष 2021 मध्ये वणी तालुक्यात घडलेली समाजमन सुन्न करणारी एक घटना गुरुवारी न्यायालयीन निर्णयाने संपुष्टात आली. स्वतःच्या जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या 26 वर्षीय मुलास केळापूर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाने गुरुवार, दिनांक 18 सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निर्णय महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील विकृत प्रवृत्तीला कठोर इशारा देणारा ठरला आहे.
📌 घटनेचा आढावा
तालुक्यातील एका गावात राहणारी पीडिता महिला 19 जुलै 2021 रोजी आपल्या मुलीला भेटण्यासाठी वणी येथे गेली होती. या कारणावरून तिच्या 26 वर्षीय मुलाने दोन ते तीन दिवस तिला सतत मारहाण केली. त्यानंतर 23 जुलै रोजी रात्री आरोपीने दारूच्या नशेत आईवर लोखंडी पट्ट्याने मारहाण केली आणि “मलम लावतो” असा बहाणा करून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. त्याने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत पहाटेपर्यंत बलात्कार चालू ठेवला. या धक्कादायक घटनेनंतर आईने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सहा दिवस उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली.

📌 पोलिसांची कारवाई
या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आरोपी नराधम पुत्राविरुद्ध भादवी कलम 376 (2)(F), 376(2)(N), 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पो.उपनिरीक्षक अरुण नाकतोडे यांनी सबळ पुरावे गोळा करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला होता.
📌 न्यायालयीन कार्यवाही
सदर प्रकरणात पीडिताची बाजू अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमेश डी. मोरे यांनी मांडली तर आरोपीची बाजू एड. सिद्धार्थ लोढा यांनी मांडली. सुनावणी दरम्यान एकूण आठ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. संतोष मडावी यांनी साक्षदार हजर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

📌 न्यायालयाचा निर्णय
18 सप्टेंबर 2025 रोजी सदर खटल्यावर निर्णय देताना सत्र न्यायाधीश अभिजित देशमुख यांनी आरोपी यांनी केलेले कृत्य आई आणि पुत्राच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा आणि समाजासाठी अत्यंत लज्जास्पद असल्याचे नमूद करीत नराधम पुत्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
📌 निर्णयाचा समाजावर परिणाम
स्वतःच्या जन्मदात्री आईवर केलेला हा अमानुष अत्याचार संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद ठरला होता. न्यायालयाचा कठोर निर्णय हा केवळ पीडितेला न्याय देणारा नसून, समाजातील अशा विकृत प्रवृत्तीला चाप लावणारा ठरेल, असे नागरिकांचे मत आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होण्यास ही शिक्षा महत्त्वाची ठरणार आहे.











