वणी टाईम्स न्युज: गेल्या चार वर्षांपासून नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. अनेक अधिकारी महत्त्वाची कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याने शहरात अडचणींचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या निर्णयांवरच सर्व काही अवलंबून असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचेही प्रकार दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून वणी येथे ‘जनता दरबार’ व भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजता जनता दरबार आणि दुपारी ३ ते ५ वाजता भव्य पक्षप्रवेश सोहळा अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असल्याची माहिती शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी दिली.
चोरडिया यांनी सांगितले की, “वणीतील नागरिकांनी आपापल्या समस्या थेट मांडाव्यात. हा कार्यक्रम सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीच आयोजित केला आहे.”नागरिकांना त्यांच्या अडचणी नोंदविण्यासाठी शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वणी विधानसभा, घर संसार सेलजवळ, जैन मंदिर समोर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी राजु रिंगोले (मो. 92848 81655) व विक्की बोलचेटवार (मो. 99221 65885) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










