वणी टाईम्स न्युज: शहरातील बेलदारपुरा परिसरात भरदुपारी एका बंद घराचे मागील दार तोडून सुमारे ७० हजार रुपये किमतीची पितळ, तांबे, जर्मन व स्टीलची जुनी वापरातील भांडी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चार अनोळखी महिला पोत्यामध्ये समान घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, शहरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीमती राजामणी पृथ्वीराज चव्हाण (55) या बेलदारपुरा येथे वास्तव्यास असून त्या ५ एप्रिल २०२६ रोजी माहेरी निजामाबाद जिल्ह्यातील आरमोरी येथे गेल्या होत्या. घराच्या पुढील बाजूस कुलूप लावून त्या निघाल्या होत्या. मात्र, मागील बाजूचा दरवाजा तुटलेला असल्याने त्यांनी तो विटा लावून बंद केला होता.
दरम्यान, २३ एप्रिल रोजी शेजारील महिलेने त्यांना फोन करून घराचे मागील दार उघडे दिसत असून चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर राजामणी चव्हाण या तत्काळ वणी येथे परतल्या. घरात पाहणी केली असता आतील दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. तसेच घरातील जर्मन गंज, पितळी परात, समई, नंदादीप, तांबे-पितळी गडवे, कास्याची ताट-वाटी, कुकर, कढई, मिक्सर, लहान फॅन तसेच इतर लहान-मोठ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले .
तक्रारदारांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 21 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता चार अनोळखी महिला पोत्यामध्ये सामान घेऊन जाताना दिसून आल्याचे तक्रारीत नमूद आहे..या प्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात चार महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.










