वणी टाईम्स न्युज | वणी तालुक्यातील शेवटच्या टोकावर आणि पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मूर्ती हे छोटंसं गाव आजही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संकटात जगत आहे. गावातून बोरी व कोरपना येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील रपट्याची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली जातो. परिणामी, मूर्ती गावातील तब्बल २५० नागरिक अक्षरशः जगापासून तोडले गेले आहेत.
16 ऑगस्टपासून नाल्यात पाणी आल्यामुळे गावातील शाळा बंद पडल्या आहेत. बोरी व कोरपना येथे शिकणारे विद्यार्थी गावातच नजरबंद झाले आहेत. गावातील शेतकरी शेतीपयोगी औषध खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत, तर एखादी व्यक्ती आजारी पडली तरी वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही. नागरिकांना शेतात जाण्यासाठी कंबरभर पाण्यातून वाट काढून जावं लागत आहे. अशातच एकाद्या दिवशी मोठी घटना घडल्याची शकतात नाकारता येत नाही.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, 2006 साली या नाल्यावर सिमेंट रपट्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पुलाची उंची वाढविण्यासाठी ना लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला, ना प्रशासनाने लक्ष दिले. 2019 मध्ये गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकूनही प्रश्न सुटला नाही. गावातून बाहेर पडणारा एकमेव रस्ता बंद पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण आहे.
मूर्ती गाव हा पैनगंगेच्या अगदी काठावर असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. “दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. आम्ही लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत पायपीट केली, पण आमच्या जीवावर आलेला धोका कोणालाही दिसत नाही. आम्हाला पुलाची उंची वाढवून द्यावी, अन्यथा आमच्या जिवाला कायमचा धोका राहील,” असा संतप्त स्वर गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास मूर्ती गाव हे दरवर्षी जलसमाधीच्या उंबरठ्यावर उभे राहणार, यात शंका नाही.










