वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा घाट येथे कोट्यवधी रुपयांच्या अवैध रेती उपशाचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या वणी तहसीलदार व संबंधित मंडळ अधिकारी राठोड यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी उपविभागीय अधिकारी, वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, बेलोरा घाट हा सध्या रेती तस्करांचा अड्डा बनला असून पोकलेन मशीनच्या सहाय्याने दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा करण्यात आला. या बेकायदेशीर उपशामुळे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून, मंडळ अधिकारी राठोड यांनी अवैध उपशाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच रेती तस्करांशी आर्थिक साटेलोटे असल्यामुळे मूक संमती दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वणी तहसीलदार यांना वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात माहिती देऊनही त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देणे टाळले, स्पॉट पंचनामा न करता वेळकाढूपणा केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हे केवळ दुर्लक्ष नसून, रेती तस्करीला दिलेले अप्रत्यक्ष संरक्षण असल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बेलोरा घाटावरील अतिउपशामुळे घरकुलधारकांना नियमानुसार रेती मिळालेली नाही. रेती घाट कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने अतिउपसा करून बेलोरा घाट ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी’ बनवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय हा प्रकार शक्य नसल्याचे स्थानिक नागरिकांचे ठाम मत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वणी तहसीलदार व मंडळ अधिकारी राठोड यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच खनीकर्म विभाग यांनाही पाठविण्यात आली आहे.
बेलोरा घाटाची ई – मोजणी करण्याची मागणी
तालुक्यातील बेलोरा रेतीघाट हा यवतमाळ येथील एक कंत्राटदाराला देण्यात आला आहे. रेती उपसा नियमांना धाब्यावर बसवून या घाटातून पोकलेन मशिनीच्या सहाय्याने दिवसरात्र हजारों ब्रास रेतीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे या घाटाची ETC ( Electronic Total Station) मशिनद्वारे ई मोजणी करण्यात यावी. अशी मागणी विजय चोरडिया यांनी निवेदनात केली आहे.










