वणी टाईम्स न्युज: यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली. साहेबराव कांबळे यांची उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणीचे निवेदन वणी नगर परिषदेचे नगरसेवक अजय पांडुरंग धोबे यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. मात्र या मागणीमुळेच राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भारतीय निवडणूक व्यवस्थेनुसार कोणत्याही पात्र व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तसेच नियमानुसार तो मागे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग मानला जातो. अशा परिस्थितीत एखाद्या उमेदवाराने स्वतःच्या इच्छेने उमेदवारी मागे घेतल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, उमेदवारी दाखल करणे किंवा मागे घेणे हा पूर्णपणे संबंधित उमेदवाराचा वैयक्तिक व राजकीय निर्णय असतो. त्यासाठी ठोस पुरावे नसताना दबाव, प्रलोभन किंवा अन्य हस्तक्षेपाचे आरोप करणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेबाबत अनावश्यक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न ठरू शकतो.
विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेची माहिती असलेल्या लोकप्रतिनिधींनीच उमेदवारी मागे घेण्याच्या घटनाक्रमावर चौकशीची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही राजकीय जाणकारांच्या मते, निवडणुकीतील घडामोडींमुळे निर्माण झालेली राजकीय निराशा किंवा अस्वस्थता यामागे असू शकते.
दरम्यान, साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा दबावाचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे केवळ संशयाच्या आधारावर चौकशीची मागणी करणे हा लोकशाही प्रक्रियेपेक्षा राजकीय स्टंटचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी निवडणूक प्रक्रियेतील मूलभूत नियम आणि उमेदवारांचे वैधानिक अधिकार यांची जाणीव लोकप्रतिनिधींनाही असणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत “उमेदवारी मागे घेणे हा उमेदवाराचा अधिकार की चौकशीचा विषय?” हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
“लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण”
साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी करणारे नगरसेवक अजय पांडुरंग धोबे हे स्वतःही अशाच प्रकारच्या राजकीय निर्णयाचे उदाहरण राहिले आहेत. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघातून मराठा सेवा संघ पक्षाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात त्यांनी स्वतःचा अर्ज मागे घेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्या वेळी स्वतःच्या उमेदवारी माघारीबाबत कोणतीही चौकशीची मागणी न करणाऱ्या धोबे यांनी आता दुसऱ्या उमेदवाराच्या उमेदवारी माघारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून, “लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” अशी चर्चा रंगू लागली आहे.










