वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

निवडणुकांची घोषणा होताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पडद्यामागे मतांच्या खरेदी-विक्रीचा बाजार रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. मतदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच कारणामुळे निवडणुकीदरम्यान “घोडेबाजार” आणि पैशांच्या जोरावर मतांची खरेदी केल्याचे आरोप नेहमीच होत आले आहेत.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, मागील विधान परिषद निवडणुकीत एका मतासाठी तब्बल ६ लाख रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यंदा वणी नगर परिषदेत २९ नगरसेवक निवडून आले असून, त्यांच्या मतांवर अनेक इच्छुक उमेदवारांची नजर लागली आहे. त्यामुळे यावेळी मतांची किंमत आणखी वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील काही मतदारसंघांमध्ये एका मतासाठी ६ ते १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार होण्याची चर्चा आहे. काही ठिकाणी रिसॉर्ट पॉलिटिक्स, गुप्त बैठका आणि मतदारांना “सुरक्षित” ठेवण्याचे प्रकारही सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे सतत बदलत असल्याने अपक्ष नगरसेवक व लहान पक्षांच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय हालचाली, बैठकांचे सत्र आणि आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.










