सुशील ओझा झरी: झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन परिसरात बनावट नोटांचे जाळे सक्रिय झाल्याची खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सिमेंट कारखान्यासह कोळसा खाणी, डोलोमाईट व इतर उद्योगांमुळे मुकुटबन परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. हजारो कामगार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या वर्दळीमुळे बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत असताना, याच परिस्थितीचा फायदा घेत काही तरुणांनी बनावट नोटांचा काळाबाजार सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अडेगाव व मुकुटबन येथील काही तरुण गेल्या काही महिन्यांपासून या अवैध धंद्यात सक्रिय असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे.

माहितीनुसार, १०० आणि ५०० रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या जात आहेत. विशेष म्हणजे या नोटा इतक्या अस्सल दिसतात की सामान्य नागरिक तर दूरच, अनेक दुकानदारांनाही त्या ओळखणे कठीण जात असल्याचे बोलले जात आहे. बिअर बार, देशी दारू दुकाने, किराणा दुकाने तसेच मटका आणि झेंडीमुंडीच्या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात या नोटा वापरल्या जात असल्याची माहिती आहे. एका लाख रुपयांच्या असली भारतीय चलनाच्या बदल्यात तब्बल तीन ते चार लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळत असल्याचे सांगितले जात असून, जलद श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी काही तरुण या धंद्यात उतरल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट वाढत असून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाला नागपूर आणि चंद्रपूर कनेक्शन असल्याची चर्चा अधिकच रंगत आहे. नागपूर येथील एका युवकामार्फत बनावट नोटांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर येत असून, काही तरुणांनी लाखो रुपयांची देवाणघेवाण केल्याचेही बोलले जात आहे. पाच लाख रुपयांच्या व्यवहारावरून संबंधित युवकांमध्ये वाद झाल्याची खमंग चर्चा मुकुटबन परिसरात ऐकायला मिळत आहे. काही तरुण वारंवार नागपूर आणि चंद्रपूर येथे जाऊन येत असल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. या पैशांच्या जोरावर काही तरुण दारू पार्ट्या, महागड्या वाहनांमध्ये फिरणे आणि उधळपट्टी करत असल्याचेही नागरिक सांगत आहेत.
दरम्यान, या गंभीर प्रकारामुळे मुकुटबन पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बनावट नोटांचे जाळे, त्यात सहभागी असलेले संशयित तरुण आणि त्यांचे बाहेरील जिल्ह्यांशी असलेले संबंध याबाबत पोलिसांना पूर्ण माहिती असूनही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बाजारपेठांमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर आणि व्यापारी वर्तुळात महिन्यांपासून या चर्चांना उधाण आलेले असताना पोलिसांची निष्क्रियता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत असून यबनावट नोटा चालविणाऱ्या या रॅकेटचे पाळेमुळे शोधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.










