वणी टाईम्स न्युज | वणी विधानसभा क्षेत्रातील युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून हा निर्णय कळविला. स्थानिक स्तरावर सहकार्याचा अभाव, निर्णयप्रक्रियेत विश्वासात न घेणे आणि संघटनात्मक कामात येणारे अडथळे यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अजिंक्य शेंडे हे युवा सेना (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) या पक्षघटनेतून सक्रिय कार्यरत होते. त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले. वणी शहरात युवक व विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश मोहीम, गरजू नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी मदत, कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, शहरात फवारणी, तसेच विविध जयंतीनिमित्त उपक्रमांचे आयोजन अशी कामे त्यांनी सातत्याने केल्याचा उल्लेख पत्रात आहे.

तसेच ‘सामना’ या अधिकृत मुखपत्रातून चार वेळा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याचा उल्लेख करत, ही बाब आपल्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, नगरपरिषद सीट वाटप, पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका आणि निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वणी विधानसभा क्षेत्रातील आमदारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली; परंतु सध्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे. जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीसंदर्भात शिफारस मिळविण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित पाठबळ मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर “मन अत्यंत व्यथित झाले असून, पुढे जबाबदारी पार पाडणे कठीण झाले आहे,” असे नमूद करत त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा सादर केला आहे. पक्ष आणि नेतृत्वाबद्दल आदर कायम राहील, अशी नम्र भूमिका त्यांनी पत्राच्या शेवटी मांडली आहे.
दरम्यान, या राजीनाम्यामुळे वणी व परिसरातील युवासेना संघटनेत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षाकडून अधिकृत भूमिका काय येते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.










