संपादक | जितेंद्र कोठारी, वणी
15 जून 2025 ची सकाळची वेळ. शहरातील नागरिक आपापल्या दैनंदिन कामांसाठी सिद्ध होत असतानाच केदारनाथजवळ घडलेल्या एका भयावह हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या बातमीनं वणी शहर सुन्न झालं. या दुर्घटनेत वणी येथील कोळसा ट्रान्सपोर्ट उद्योगातील नावाजलेले उद्योजक आणि श्रद्धावान व्यक्तिमत्त्व राजकुमार ऊर्फ राजा जैस्वाल (41), त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल (35) आणि अडीच वर्षांची लाडकी मुलगी काशी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर 18 जून रोजी तिघांचे पार्थिव देहांचे वणीमध्ये आगमन झालं. एकाच घरातील तिघांच्या शवपेट्या बघून कुटुंबीय आणि मित्र मंडळीने हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराच्या वेळी शहराचं वातावरण गहिवरलं. अश्रूंनी सर्वांचे डोळे पाणावले होते, आणि मनात विचार उठला — इतकं सगळं संपावं? इतक्या क्षणात?
राजा जैस्वाल यांनी अल्प वयात परिश्रम, दूरदृष्टी आणि चिकाटी यांच्या जोरावर कोळसा ट्रान्सपोर्ट व्यवसायात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. त्यांच्याकडे ट्रक व कोळसा लोडिंग यंत्राचा फौजफाटा होता. राज्य व केंद्रीय स्तरावरील काही राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. धार्मिक वृत्ती, संयमित बोलणं, आणि सामाजिक कार्यामधील सहभाग यामुळे त्यांनी शहरात वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या वैयक्तिक जीवनातही संघर्षाची किनार होती. पहिल्या पत्नी एकता यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांच्यापासून त्यांना दोन मुलं आहेत. आईची छत्रछाया गमावलेले दोन चिमुकल्या मुलांचे पालनपोषण आणि कुटुंबीयांच्या आग्रहास्तव त्यांनी श्रद्धा बोरुले हिच्याशी विवाह केला, आणि त्यांना एक गोंडस मुलगी झाली – काशी. मात्र नियतीनं त्यांचं यश, ऐश्वर्य, श्रद्धा, आणि कुटुंब… हे सगळं एका क्षणात हिरावून घेतलं.
धार्मिकता आणि समाजकार्याचा तो “राजा”
राजा व श्रद्धा जैस्वाल दांपत्याया पुढाकाराने फेब्रुवारी 2024 मध्ये वणी शहरात पं. प्रदीप मिश्रा यांची काशी महा शिवपुराण कथा व ऑगस्ट 2024 मध्ये वणी ते शिरपूर महादेव गडापर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करून शहरात अध्यात्माची दीपमाळ प्रज्वलित केली होती. ऑगस्ट 2025 मध्ये कावड यात्रेचे नियोजनही त्यांनी केले होते. धार्मिक वृत्तीचे जैस्वाल दांपत्याने एका वर्षात भारतातील अकरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून शेवटच्या बाराव्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी केदारनाथ गाठले होते. परंतु, त्याच प्रवासात ते मृत्यूच्या वाटेवर निघाले…
त्यांचं आयुष्य संपलं – मात्र मागे राहिलं आहे एक अनुत्तरित शोककथा: दोन चिमुकली मुलं, वृद्ध आई, आणि भरात असलेला कोळसा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. ज्याचं नियोजन, नियंत्रण, आणि भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेलं आहे.
संपत्ती जपता येते, परंतु नियती टाळता येत नाही
राजा जैस्वाल यांचा कोट्यवधींचं व्यवसाय, आलिशान बंगला, महागड्या गाड्या, प्रतिष्ठित ओळखी, आणि समाजात मिळवलेला मान – हे सगळं एका अपघातानं संपलं. आणि या घटनेनं पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे स्वीकारायला हवं की…
“माणूस कितीही मोठा असो, नियतीपुढे तो क्षणभंगुर आहे.”
आपण जीवनात प्रगती करतो, संधी मिळवतो, नाव कमावतो – पण शेवटी आपल्या हातात असतो तो फक्त आजचा क्षण. उद्या काय घडेल, हे कोणालाही ठाऊक नसतं. माणूस कितीही श्रीमंत असो, बलशाली असो किंवा प्रभावशाली असो, त्याचा मृत्यू अटळ आहे. नशिबात जे लिहून आहे ते सुख दुःख भोगावेच लागणार.
हेच अंतिम सत्य ..!