वणी टाईम्स न्युज : येथील साई मंदिर ते नांदेपेरा चौफुली पर्यंत राज्यमार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा आणि वेळकाढू धोरणाने संतप्त नागरिकांनी गुरुवार सकाळी 10 वाजता पासून रस्ता रोको आंदोलन सुरू केला. रेल्वे क्रॉसिंग पासून काही मीटर अंतरावर वऱ्हाडी ढाबा समोर रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी तब्बल अडीच तास या मार्गावरील संपूर्ण वाहतूक रोखण्यात आली. यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाचारण करण्यात आले व 11 जून किंवा त्यापूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
वणी शहरातील अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा मार्ग असताना मागील दोन वर्षापासून या रस्त्याची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. रस्त्यावर हजारोच्या संख्येने खड्डे पडले असून वाहन चालकाना खड्ड्यातून मार्ग शोधून वाहन चालवावी लागत आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून साई मंदिर चौक ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता मंजूर झाला. सदर कामाची निविदा मंजूर होऊन तब्बल 9 महिने झाले असता कंत्राटदारांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी अर्धवट नाल्यांचे बांधकाम करून सोडून दिले.
रस्त्याच्या बांधकामासाठी राजकीय व सामाजिक संघटनांनी अनेकदा बांधकाम विभागाला निवेदने सोपविली. मात्र कंत्राटदाराच्या दावणीला बांधलेल्या बांधकाम अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी आश्वासन देऊन वेळ मारून नेली. अशातच रस्त्याची दुरावस्था व धुळीमुळे त्रस्त नांदेपेरा मार्गावरील राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी 31 मे रोजी बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन 4 जून पर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू न केल्यास 5 जून रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र दरवेळी प्रमाणे बांधकाम अधिकाऱ्यांनी या निवेदनाकडेही लक्ष दिले नाही.
त्यामुळे संतप्त नांदेपेरा मार्गावरील नागरिक गुरुवार 5 जून रोजी रस्त्यासाठी रस्त्यावर बसले. यावेळी पोलिस प्रशासनाने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची विनंती केली. मात्र जो पर्यंत बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन लेखी देणार नाही तो पर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याचा ठाम निर्णय नागरिकांनी घेतला. अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता एस. एस. दुधाळे व उप विभागीय अभियंता केतन परतानी हे आंदोलनस्थळी आले. यावेळी नागरिकांनी कार्यकारी अभियंता यांना चांगलेच खडे बोल सुनावले. रस्ता बांधकाम कधी करणार याबाबत जेव्हा पर्यंत तुम्ही लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला. शेवटी 12 जून किंवा त्यापूर्वी या रस्त्याचे बांधकाम सुरू करणार असल्याचा लेखी पत्र बांधकाम विभागाने दिल्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतला.
बघा नागरिक व बांधकाम अधिकाऱ्यांचे संभाषण
रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलनात बाबाराव ठाकरे, अजय धोबे, मोरेश्वर पावडे, भिमराव कवाडे, जितेंद्र कोठारी, सतीश पिंपळे, बाबाराव चट्टे, विजय कवरासे, अंकुश जैस्वाल, रुपेश राजूरकर, राजू उंबरकर, बाळू जोगी, भगवान दुमोरे, नरेंद्र चिकटे , रवींद्र वांढरे, प्रमोद मिलमिले, गणपत लेडांगे, प्रवीण आसुटकर, सिद्दिक भाई, के. ए. सय्यद, राजा जैस्वाल, बजरंगलाल कुमावत, फाल्गुन गोहोकर, सय्यद मतीन, सचिन पोटे, महेंद्र राजूरकर, अतुल लिचोडे व इतर शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला.