वणी टाईम्स न्यूज | वणी शहरालगत वडगाव (धंदीर) येथील भूखंड विक्री प्रकरणात खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अखेर वणी पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, फिर्यादी हा पत्रकार असून तब्बल दीड वर्षापासून तक्रारी करूनही ठाणेदार उंबरकर कारवाई करण्यात टाळाटाळ करीत होते. अखेर शुक्रवारी 15 मे रोजी वणीतील सुमारे 20 ते 25 पत्रकारांनी थेट पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या कार्यालयासमोर चटई टाकून तब्बल 5 तास ठाण मांडून बसले. त्यानंतर रात्री उशिरा 10 वाजता FIR दाखल करण्यात आली.

सदर प्रकरणात प्लॉटचे खोटे कागदपत्र तयार करून विक्री करणारा आरोपी शैलेश दादाजी वाकडे, रा. बाबुपेठ चंद्रपूर, अर्जनवीस सतिश पुंडलीकराव केराम, रा. ओमनगर, चिखलगाव, वडगावचे तत्कालीन तलाठी रविंद्र निळकंठ उपरे व मंडळ अधिकारी राजु निळंठराव डोंगरे विरुद्ध खोटे दस्तावेज तयार करणे, शासकीय नोंदीत फेरफार करणे व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 318(4), 336(3), 340 (2) आणि 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तक्रारदार सूरज रमेश चाटे व संध्या संजय तरवटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै 2024 मध्ये वडगाव (ध.) येथील गट क्रमांक 15/1-अ मधील प्लॉट क्रमांक 30 खरेदी करण्याचा व्यवहार करण्यात आला होता. विक्रेता शैलेश वाकडे, अर्जनवीस सतीश केराम, तलाठी रविंद्र उपरे व मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांनी संबंधित कागदपत्रे खरी असल्याचे दाखवून व्यवहार घडवून आणल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांनी नोंदणीकृत विक्रीपत्र करून 1 लाख 20 हजार रुपये धनादेशाद्वारे अदा केले होते. त्यानंतर फेरफार नोंदणी व सातबारा उतारा देखील तक्रारदारांच्या नावे देण्यात आला. मात्र नंतर चौकशीत संबंधित भूखंडाचा मूळ मालक दुसराच असल्याचे समोर आले. तसेच फेरफार क्रमांक 1539 हा खोटा असल्याचेही उघड झाले.
या प्रकरणी तक्रारदारांनी महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय व वणी पोलीस स्टेशन येथे वारंवार तक्रारी दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असतानाही स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही. उलट महसूल विभागातील अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, पत्रकार सूरज चाटे यांनी स्वतःवरील फसवणूक आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत स्थानिक पत्रकारांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी पत्रकारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार गोपाल उंबरकर यांना थेट प्रश्न विचारले. सुरुवातीला विविध कारणे देत ठाणेदाराने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा मुद्दा उपस्थित करताच वातावरण तापले. अखेर पत्रकारांच्या दबावानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणेदारांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात !
वडगाव भूखंड फसवणूक प्रकरणात वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही स्थानिक पोलिसांनी जवळपास 18 महिने कोणतीही कारवाई केली नाही.
तक्रारदार सूरज चाटे यांनी आरोप केला की, पोलिसांकडे सर्व पुरावे, महसूल चौकशी अहवाल आणि फसवणुकीची कागदपत्रे उपलब्ध असतानाही आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः महसूल विभागातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल टाळण्यासाठी विविध कारणे पुढे करण्यात आली. याच काळात उपविभागीय अधिकाऱ्यांकडून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करू नये, असे पत्र पोलिसांना देण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनातील संगनमताबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
शुक्रवारी पत्रकारांनी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार उंबरकर यांना थेट जाब विचारल्यानंतर परिस्थिती बदलली. पत्रकारांच्या उपस्थितीत पोलिसांची भूमिका बचावात्मक झाल्याचे दिसून आले. सुरुवातीला प्रकरण नागरी स्वरूपाचे असल्याचे सांगितले गेले; मात्र पत्रकारांनी खोटे फेरफार, बनावट सातबारा आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे समोर ठेवल्यानंतर पोलिसांकडे उत्तर नसल्याचे चित्र निर्माण झाले.
अखेर वाढता दबाव आणि माध्यमांचे लक्ष पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही इतका विलंब का झाला ? आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला का आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत ? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पत्रकारांच्या समर्थनात आजी माजी आमदार पोहचले ठाण्यात
सायंकाळी 5 वाजता पासून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसलेल्या पत्रकारांना ठाणेदार उंबरकर यांनी दाद दिली नाही. शेवटी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे पोलिस ठाण्यात पोहचले व त्यांनी ठाणेदाराशी चर्चा केली. त्यानंतर रात्री 9 वाजता आमदार संजय देरकर हे मुंबईवरून नागपूर व तेथून थेट वणी पोलिस स्टेशनमध्ये पोहचले. त्यांनीही पत्रकारांची भूमिका योग्य असून दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून काही राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याची माहिती आहे.










