वणी टाईम्स न्युज : वणी उप विभागात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी आहे. वेकोलिसह खाजगी कोळसा खाणी आणि इतर उद्योग असूनही स्थानिक भूमिपुत्र युवकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मतदार संघातील 20 हजार युवकांच्या हाताला काम मिळवून देत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार. अशी शाश्वती मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी दिली.
वणी आणि परिसरात विपुल खनिज संपत्ती आहे. ज्यात दगडी कोळसा, डोलामाईट, लाईमस्टोन मिळतो. तर याच आधारे काम करणाऱ्या अनेक कंपन्या सुध्दा या भागात कार्यरत आहे. तर अलीकडे बिरला उद्योग समूहाची सिमेंट कंपनी सुध्दा मुकुटबन येथे स्थापन झाली. रोजगाराच्या दृष्टीने एवढी उपलब्धी असताना सुद्धा येथील युवकाच्या हाताला काम नाहीं. बेरोजगारी आणि नैराश्यातून जीवन संपविण्याच्या अनेक घटना घडल्या. उच्च शिक्षित असून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक युवक पुणे – मुंबई सारख्या महानगराची वाट धरतात.
या सर्वांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मागील वर्षी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात 6 हजार 700 युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत मतदारांनी आमदारकीची संधी दिल्यास 20 हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांनी केली.