वणी टाईम्स न्युज : शहरातील पंचशील नगर भागात उघडकीस आलेल्या सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा नोंद होऊनही अद्याप ठोस व परिणामकारक कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना अंतिम स्मरणपत्र सादर केले आहे.
स्मरणपत्रानुसार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी लेखी निवेदन देऊनही आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या चौकशी अहवालानंतरही आरोपींवर अटक किंवा वाहन जप्तीची कारवाई झालेली नाही. तक्रारीत नमूद आरोपी ८ डिसेंबर २०२५ पासून मोकाट असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले MH-24-BL-7051 क्रमांकाचे वाहन अद्याप जप्त न होणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तपास सुरू असल्याचे अधिकृत अहवालात नमूद असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नसल्याने तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दिरंगाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व निलंबनाची मागणी स्मरणपत्रात करण्यात आली आहे. तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, गुन्ह्यात वापरलेले वाहन त्वरित जप्त करावे व तपासात दिरंगाई करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करावी. अशी मागणी केली आहे
आंदोलनाचा इशारा
सदर मागण्या येत्या सात दिवसांत पूर्ण न झाल्यास, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता वणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही स्मरणपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत आमदार संजयजी देरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती विभाग), जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार वणी, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तसेच वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आली आहे.










