वणी टाईम्स न्युज : शहरातील साई मंदिर ते नांदेपेरा मार्ग रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्ते बांधकाम सुरु आहे. डिव्हायडरसह होणाऱ्या या रस्त्याच्या एका बाजूचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली. मात्र वाहतूक सुरु असलेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जिवाला धोका ठरत आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला करूनही वीज खांब हटविण्यात आले नसल्याने एकाद्या दिवशी मोठे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघाताला खुले आमंत्रण देत असलेले विद्युत खांब हटविण्यात न आल्याने नागरिकांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे
उल्लेखनीय आहे की साई मंदिर ते नांदेपेरा मार्ग हा शहरातील सर्वाधिक रहदारीचा असून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा असते. विशेष म्हणजे याच रस्त्यावर शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थी, पालक तसेच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला वीज खांब हा गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतो. रात्रीच्या वेळी किंवा वाहतूक अधिक असताना चालकांचे लक्ष चुकल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे संबंधित प्रशासन, कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, “जर एखादा अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी की विद्युत विभाग—याबाबत स्पष्टता नसणे ही देखील चिंतेची बाब आहे. अपघात होण्यापूर्वीच संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन वीज खांब हलवावा व रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागांवर राहील, असा इशाराही स्थानिकांकडून दिला जात आहे.
लोकप्रतिनिधि व प्रशासनिक अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का ?
वणी हा तालुक्याचे ठिकाण असून आमदार, न्यायाधीश, उप विभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार, उप विभागीय पोलिस अधिकारी (SDPO), ठाणेदार, वाहतूक शाखा अधिकारी नांदेपेरा मार्गाने ये जा करतात. मात्र शासनाने सोपविलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त येथील नागरिकांच्या प्रति त्यांची काहीही जबाबदारी नाही का ? येता जाताना त्यांना ही बाब लक्षात येत नाही का ? याबाबत त्यांनी स्वतःहून कधी कंत्राटदार किंवा बांधकाम विभागाशी संपर्क साधून विद्युत खांब हलविण्याचे निर्देश दिले काय ? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे.










