वणी टाईम्स न्युज | संतोषी मातेचे दर्शन घेण्याकरिता मंदिरात गेलेली अवघ्या 13 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वणी शहरातील एका भागात घडलेल्या या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी हा स्वयंपाकाचे काम करीत असून 3 एप्रिल रोजी सकाळी ते आपल्या कामावर निघून गेले. सायंकाळी 4 वाजता सुमारास फिर्यादी यांच्या पत्नीने फोन करुन सांगितले की, अंजली (बदललेले नाव) ही दुपारी 2 वाजता संतोषी माता मंदिरात गेली तर अजून पर्यंत घरी आली नाही. त्यावर फिर्यादी वडिलांनी अंजलीच्या मोबाईलवर कॉल केला असता रिंग जात होती, पण ती कॉल रिसिव्ह करत नव्हती.
रात्री 8 वाजेपर्यंत आजूबाजूचे परिसर, मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे विचारपूस केली असता अंजलीचा पत्ता लागला नाही. शेवटी मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 137(2) BNS नुसार गुन्हा दाखल करुन मुलीचे शोध घेणे सुरु केले आहे.
सोशल मिडियाचे दुष्परिणाम !
मागील काही काळापासून 13 ते 17 वयोगटातील मुली घरातून बेपत्ता होण्याचे किंवा पळून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुलं मुली बेपत्ता होण्यामागे सोशल सोशल मीडियाचा मोठा हात असल्याचे दिसून येत आहे. कमी वयात व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर आणि अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग हा धोकादायक ठरत आहे.
अल्पवयीन मुलांना सोशल मिडिया वापरण्याची बंदी !
इंटरनेट आणि सोशल मिडियाचे दुष्परिणाम लक्षात घेता अनेक देशाने 18 वर्षाखालील मुलांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घातली आहे. भारतातही अशी मागणी जोर धरत असून सरकार या विषयावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे बोलले जाते.










