वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र राज्य वीज वितरण निगम (महावितरण) चे उपविभागीय कार्यालय नुकतेच शहरातील शेवाळकर चौक परिसरातील स्नेहगौत्री बिझनेस प्लाझा इमारतीत स्थलांतरित झाले आहे. परंतु हे कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असून, नागरिकांना पायऱ्यांचा डोंगर चढून कार्यालयात पोहोचणे ही एक मोठी कसरत ठरत आहे.
दररोज शहर तसेच ग्रामीण भागातील शेकडो ग्राहक वीज बिल भरणा, बिलातील वाढीव रक्कम कमी करणे, नवीन जोडणी तसेच इतर तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात येतात. मात्र तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट बंद असल्याने त्यांना तक्रारी सोडविण्याआधीच ‘पायऱ्यांचा डोंगर’ चढावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचे सोयीसाठी असलेले कार्यालयच त्यांच्यासाठी त्रासाचे ठिकाण झाले आहे.
ग्राहकांची नाराजी व्यक्त
अनेक ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “वीज तक्रारीसाठी येताना आधीच मनस्ताप होतो, त्यात तिसऱ्या मजल्यावर चढताना अक्षरशः दम काढतो,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. एखाद्याला तातडीने बिल भरायचे असल्यास किंवा तक्रार नोंदवायची असल्यास त्यांना पायऱ्या चढताना त्रास सहन करावा लागत आहे.
सुविधांची वानवा
नवीन कार्यालय सुरु करताना लिफ्ट सुरळीत सुरू ठेवणे व नागरिकांसाठी किमान सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ‘महावितरणच्या कारभाराची ही आणखी एक अजब कहाणी’असेच नागरिक म्हणत आहेत.
लोकप्रतिनिधी व संघटना मौन का?
या गंभीर समस्येकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना मौन बाळगत असल्याने नागरिकांत संताप आहे. जनतेच्या सोयीसाठी असलेली लिफ्ट बंद का ठेवली जाते ? जबाबदारी कोणाची ? हा प्रश्न आता टोकाला गेला आहे.
आंदोलनाची हाक अपरिहार्य !
“महावितरणसारख्या महत्त्वाच्या विभागाचे कार्यालय जाणीवपूर्वक तिसऱ्या मजल्यावर ठेवणे म्हणजे नागरिकांची थट्टा आहे. शहरातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा नागरिकांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” अशी चर्चा सध्या शहरभर रंगली आहे.










